उतारा क्रमांक 1

उतारा क्रमांक 1

२ आॅक्टोबरला गांधीजींच्या मूर्तीसमोर केवळ हात जोडल्याने गांधीजींच्या विचारांचे पाईक होता येत नाही. त्यासाठी गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची धमक दाखवावी लागते. परंतु, सध्या सर्व जण दुटप्पी भूमिकेत जगत असल्याने किती गंभीरतेने बापूंचे विचार अमलात आणले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. गांधीवादावर आता कोणाची श्रद्धा राहिली आहे, हाच आता प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थासाठीच बापूंचा उपयोग झाला आहे व होत आहे. सध्या समाजाचा प्रत्यक्ष कार्यापेक्षा प्रतिमेवर जास्त विश्वास असल्याने प्रतिमानिर्मिती करण्याकडे सर्वांचा कल आहे. भिंतीवर महापुरु षांची तसबीर टांगली की आपली जबाबदारी संपली, असा विचार केला जात आहे. मात्र, प्रतिमेच्या प्रेमात पडण्याऐवजी व भिंतीवर तसबिरी टांगण्याऐवजी हृदयात महापुरुषांची प्रतिमा कोरली जावी यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. हृदयात प्रतिमा कोरली गेल्यावर त्या महापुरुषाच्या विचारांवर आपोआप आचरण केले जाते. एकीकडे बापूंचे नाव, त्यांची प्रतिमा वापरली जात असताना प्रत्यक्षात बापूंच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण केले जात आहे. नथुरामचे मंदिर उभारले जात आहे. मात्र आता या बाबीचे जास्त आश्चर्य आम्हाला वाटत नाही व त्यांचा द्वेष वाटत नाही. कारण मारेकऱ्यांची पूजा करणे ही त्यांची संस्कृती आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम त्यांना आवडत नाहीत, त्यांना रावणाचा वध करणारे रामच आवडतात. हा प्रकार वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. नथुरामभक्तीमध्ये ते प्रामाणिक आहेत. त्यामध्ये दांभिकता दिसत नाही.
सध्या देशभक्तीलादेखील दिखाऊपणा आला आहे. आपली देशभक्ती नाटकी, प्रचारकी पद्धतीची झाली आहे. समाजाची एकरूपता कमी झाली आहे. नेहमी सुप्तावस्थेत असणारी आपली देशभक्ती पाकिस्तानसोबत युद्ध झाले किंवा भारत-पाक सामना असेल तर उफाळून येते. समाजातील जातीयता, धर्मांधता वाढू लागली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत स्थानिक व परप्रांतीय असा भेद निर्माण करणे हा याच भूमिकेचा परिपाक आहे. प्रांतीयवाद, जातीयवाद, धर्मांधता यांचा कहर वाढून शेवटी देश-राष्ट्र म्हणून आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती असते, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय लाभाच्या हेतूने विविध राजकीय पक्षांकडून अशा प्रवृत्तींना जाणीवपूर्वक वाढवले जात आहे. त्यामुळे समाजात विष पेरले जात आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या धुव्रीकरणामुळे समाज विभागला जात आहे. याचा नेमका लाभ नाझी-फॅसिस्ट शक्तींना मिळत आहे. राजकीय इच्छाशक्तीपुढे सामाजिक सलोखा नष्ट होत आहे. महापुरुषाचे अनुयायी बनण्याची पात्रता आपल्यात उरली आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे. सत्ताधाºयांचे आदर्श कोण आहेत हे जगजाहीर आहे. मात्र तरीही बापू त्यांची मजबुरी आहेत. त्यांना वगळून पुढे जाता येणे अशक्य झाले आहे, ही गांधीवादाची शक्ती आहे.

Comments

Popular posts from this blog

भारताच्या राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये

मौर्य कालीन भारत

उत्तरेकडील प्राचीन राज्ये