उतारा क्रमांक 2
उतारा क्रमांक 2
छद्मविज्ञानाचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जातिसंस्थेची भलामण. गेल्या पाच हजार वर्षांपासून, किंबहुना मानव जातीच्या उद्गमापासून जातिसंस्था अस्तित्वात आहेत, कारण ती ईश्वरनिर्मित. म्हणून नैसर्गिक व अपरिवर्तनीय आहे. जातिसंस्थेतील बंधनांमुळे त्या त्या जातीची (आनुवंशिक) गुणवैशिष्टय़े टिकून राहतात. त्या वैशिष्टय़ांमुळे काही जाती (जात्याच) थोर किंवा कनिष्ठ असतात.. ही व असली विधाने स्वतला उच्चशिक्षित म्हणविणाऱ्या व्यक्ती बेधडकपणे करीत असतील, तर कठीण आहे. या गुंतागुंतीच्या विषयात फारसे न अडकताही अनुवंशशास्त्र व त्याच्या जेनोमिक्ससारख्या उपविद्याशाखा त्यावर काय सांगतात हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जेनोमिक्स’ या पश्चिम बंगालमधील संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, भारतात जातींतर्गत विवाहाची सक्ती गेल्या ६०-७० पिढय़ांपासून, म्हणजे सुमारे १२००-१४०० वर्षांपूर्वी व्यवहारात रूढ झाली. तीही प्रामुख्याने उच्च जातीतल्या स्त्रियांपुरती होती. उच्च जातीतील पुरुष अन्य जातींतील स्त्रियांशी सर्रास संबंध ठेवू शकत. म्हणजे भारताच्या ज्ञात इतिहासातील पहिल्या सुमारे दोनतृतीयांश काळात जातींमधली सरमिसळ ही नित्यनेमाने घडणारी बाब होती. आद्य स्त्रीचा कालखंड आजच्या १,८०,००० वर्षांपूर्वीचा मानला जातो, तर आदिम पुरुषाच्या पहिल्या पाऊलखुणा १,४०,००० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या तुलनेत १२००-१५०० वर्षे हा कालावधी मानव जातीच्या उत्क्रांतीच्या मानाने अतिशय क्षुल्लक आहे. त्यामध्ये कोणतेच महत्त्वाचे आनुवंशिक बदल घडणे शक्य नाही. किंबहुना जात व तिची वैशिष्टय़े ही बाब कोणत्याही वैज्ञानिक निकषांवर टिकणारी नाही.
खरे तर पृथ्वीवरील मानवांची बाह्य रूपे कितीही भिन्न असली तरी त्यांचा डीएनए ९९.९९ टक्के एकसारखा आहे.
नुकतीच माझ्या एका तरुण मित्राने आपली जेनोमिक कुंडली बनवून घेतली, त्यासाठी त्याने आपल्या लाळेचा नमुना जेनोमिक संशोधन करणाऱ्या एका संस्थेकडे पाठविला. त्या कुंडलीनुसार त्याच्या आनुवंशिक गुणधर्मात ५६ टक्के नर्ऋत्य आशियाचे, २६ टक्के आग्नेय आशियाचे, १२ टक्के भूमध्य भागाचे, तर सहा टक्के उत्तर युरोपचे गुणधर्म सापडले. इतकेच नाही तर त्याच्या डीएनएमध्ये निएन्दरथल (Neanderthal’) व देनिसोवान (Denisovan) या आता नष्ट झालेल्या प्रजातींचाही अंश सापडला आहे. आपल्यापैकी कोणीही आपली जेनोमिक कुंडली बनवून घेतली तर ती (अगदी शुद्ध रक्ताच्या कडव्या अभिमान्यांच्या बाबतीतही) फारशी वेगळी नसेल.
कविवर्य विंदा करंदीकरांनी सांगितलेले ‘मानवाचे अंती एक गोत्र’ हे केवळ काव्यमय सत्य नसून ते अत्याधुनिक विज्ञानाच्या कठोर निकषांवर सिद्ध झालेले वैज्ञानिक सत्य आहे. आपण ते अंगीकारले, तर आपणा सर्वाचे जीवन किती सुसह्य व आनंदी होईल. पण हे सत्य स्वीकारण्याची आपली तयारी आहे का?
Comments
Post a Comment